Monday, 27 May 2013

नेमाडे ७५ खरंच !!

Published: Sunday, May 26, 2013
 http://www.loksatta.com/lokrang-news/bhalchandra-nemade-118654/

भालचंद्र नेमाडे यांच्या 'कोसला', 'बिढार', 'हूल', 'जरीला' आणि 'झूल' या कादंबऱ्या वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवत असत. त्यांनी कादंबरीला एक वेगळे रूप दिले होते. ती कथानकप्रधान नव्हती. त्यात अनेक प्रसंग होते. नेहमी आढळणारे. पण त्याबद्दलची नायकाची दृष्टी आणि त्याचे चिंतन म्हणा ना. हा तर कादंबरीचा मुख्य गाभा होता. त्यासाठी लागणारी भाषाही त्यांनी कमावली होती. तत्कालीन घटनांचा मागोवा घेणे हे नेमाडेंच्या कादंबऱ्या करतच. कादंबरीलेखनाला देण्यात आलेले हे वळण पुढे अनेकांनी गिरवले. परंतु त्यामागील चिंतनशीलता आणि त्यासाठी लागणारा व्यासंग यांमुळे नेमाडे हे नेमाडे ठरले..
ख रं वाटत नाही, परंतु भालचन्द्र नेमाडे पंचाहत्तर वर्षांचे होताहेत. खरं असणार. कारण त्यांच्या 'कोसला'लाच पन्नास र्वष होताहेत या वर्षी. तेव्हा 'तरुणाने तरुण वाचकांसाठी लिहिलेली तरुणांची कादंबरी' म्हणून 'कोसला' गाजली होती आणि आजच्या तरुण वाचकांनाही ती आपलीच वाटते. तरी र्वष जात राहतातच की!
कादंबरीकार नेमाडे, कवी नेमाडे, समीक्षक-विचारवंत नेमाडे यांच्याविषयी लिहायला अशा वैयक्तिक प्रसंगाची आवश्यकता नाही. काही वेगळं लिहायचं झालं तर प्रचंड अभ्यास करावा लागेल असं त्यांचं लेखन आहे. तरीही त्यांच्याबद्दल सतत लिहिलं जात असतं. असं लेखन चिकित्सकपणे साधकबाधक व्हायला हवं. आता त्यांच्या जीवनातील या पाऊणशेच्या टप्प्यावर त्यांच्या कुटुंबीयांसोबत आनंद वाटून घेताना स्नेहभावच आळवायचा आहे.
हे करताना माझ्या दृष्टीने काही गोष्टी सोयीच्या आहेत. मी नेमाडेंना ओळखू लागलो तेव्हा काही मी त्यांचा प्रकाशक नव्हतो. 'कोसला' १९६२ साली प्रसिद्ध झाली ती देशमुख कंपनीतर्फे. तोवर देशमुखांनी खांडेकर- माडखोलकर- काणेकर यांच्या पिढीतील प्रामुख्याने यशस्वी लेखकांची पुस्तकं प्रसिद्ध केली होती. फार तर नंतरच्या पिढीतील अरिवद गोखले यांची एक-दोन पुस्तके. गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर यांनाही त्यांनी हात लावला नव्हता. 'नेमाडे' हे सर्वस्वी नवे नाव त्यांच्या यादीत अगदी वेगळे वाटत होते. हे वेगळेपण प्रकाशकालाही जाणवले असणार. कारण देशमुख प्रकाशनांपकी दीनानाथ दलाल यांचे वेष्टन नसलेले मला वाटते हे पहिलेच पुस्तक असावे. एका अमूर्त (अ‍ॅब्स्ट्रॅक्ट) कव्हरचे पुस्तक हातात ठेवून रामभाऊ त्याचे वेगळेपण आणि मोठेपणा सर्वाना सांगत असत. बॉम्बे बुक डेपोत आमच्या नेहमी भेटी होत आणि वरचेवर ते या नव्या लेखकाबद्दल अभिमानाने आणि आत्मीयतेने बोलत. बहुधा हा बदल त्यांच्या सुविद्य पत्नी सुलोचनाबाई यांच्यामुळे असावा. प्रत्यक्ष 'कोसला' वाचली आणि का, ते लगेच कळलं. तेव्हाच वाटलं, की ही तर आपल्या घराण्याची.. म्हणजे 'पॉप्युलर'ची कादंबरी. साहित्यातही घराणी असतात म्हणायचे! महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिली काही वष्रें माझा नेमाडेंशी परिचय ते एक श्रेष्ठ लेखक आणि मी एक त्यांचा चाहता- सामान्य वाचक असाच होता.
हा माझ्या प्रकाशकीय जीवनातील एक गमतीदार टप्पा होता. मी माझ्या सतरा-अठरा वयावर प्रकाशनाला सुरुवात केल्यामुळे तोवरचे माझे लेखक माझ्याहून वयाने बरेच मोठे असायचे. या दहा वर्षांच्या प्रकाशनानंतर माझे वय दहा वर्षांनीच वाढलं असलं तरी मला अनुभवानं खूप वयस्क झाल्यासारखं वाटत होतं. त्यावेळी १९६०-७० या दशकात नेमाडे, महानोर, ग्रेस असे माझ्याहून वयाने लहान लेखक माझ्यासमोर आले. लेखक-वाचक नात्यात वयाचा प्रश्नच येत नाही. नेमाडेंना मी भेटायचो तो वाचक या नात्याने. क्वचित गप्पामित्र म्हणून! त्यावेळी अनियतकालिकांच्या चळवळीतले त्यांचे बरेचसे साथीदार माझेही मित्र होते.
पुढे काहीतरी कारणाने नेमाडे देशमुखांच्या परिवारातून निसटले. तोवर नागपूरहून अमेय प्रकाशनने या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. सुरुवातीपासून त्यांनी ग्रेस, एलकुंचवार अशा माझ्या जिव्हाळ्याच्या लेखकांपासून सुरुवात केली. ग्रेस त्यांचे सल्लागार होते. चित्रकार सुभाष अवचट यांची सजावट, उत्तम मुद्रण या सर्व बाबतींत अमेय प्रकाशन आमचे सहोदर वाटत. अशा प्रकारे जाणीवपूर्वक चांगली पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या प्रकाशकांबद्दल मला स्पध्रेची भावना वाटत नाही, तर जवळीक वाटते. त्यांच्या यादीत नेमाडेंची  'बिढार' पाहून चुटपुट वाटली असणार; पण काहीसा आनंदही झाला. अमेयच्या सुरुवातीच्या दिवसांत माझी िपपळापुरे-मुंजे यांच्याशी गट्टी जमली. पुढे काही कारणांनी त्यांनी फक्त क्रमिक पुस्तकांवर भर द्यायचं ठरवलं आणि ललित वाङ्मयाचं प्रकाशन थांबवलं.
इतके दिवस मी संयम दाखवून नेमाडेंचा फक्त वाचक यावर संतोष मानला होता. आता गप्प राहणं कठीण वाटू लागलं. काही करून नेमाडेंची पुस्तकं योग्य ठिकाणी पोचली पाहिजेत- म्हणजेच आमच्याकडे यायला हवीत, असं तीव्रतेनं वाटू लागलं. सगळा इतिहास सांगायचं प्रयोजन नाही; पण माझा सहकारी मित्र कृष्णा करवार याचे नेमाडेंशी विशेष संबंध होते. त्याला मधे घातला. नेमाडे तेव्हा औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात होते. आम्ही मुद्दाम तिथे गेलो आणि तेव्हापासून नेमाडेंच्या कादंबऱ्या पॉप्युलरकडे आल्या. त्यात 'कोसला', 'बिढार'च्या नवीन आवृत्त्या होत्याच; शिवाय 'बिढार'चे पुढील भाग 'जरीला' आणि 'झुल' या नवीन कादंबऱ्याही होत्या. मग नेमाडे म्हणाले की, मुळात 'बिढार' ही चार भागांत लिहिलेली कादंबरी होती. प्रकाशकाच्या सोयीसाठी त्यातील दोनच भाग एकत्र छापून थांबलो होतो. पण 'बिढार'मध्ये 'हूल' हा दुसरा भागही तसा उल्लेख न करता समाविष्ट होता. तेव्हा मग चांगदेव चतुष्टय़- 'बिढार', 'हूल', 'जरीला' आणि 'झूल' असे चार भाग आम्ही छापू लागलो. या कादंबऱ्या वाचताना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणवत असत. त्यांनी कादंबरीला एक वेगळे रूप दिले होते. ती कथानकप्रधान नव्हती. त्यात अनेक प्रसंग होते. नेहमी आढळणारे. पण त्याबद्दलची नायकाची दृष्टी आणि त्याचे चिंतन म्हणा ना- हा तर कादंबरीचा मुख्य गाभा होता. त्यासाठी लागणारी भाषाही त्यांनी कमावली होती. मामा वरेरकर म्हणायचे की, कादंबऱ्या या बखरीसारख्या असाव्यात. तत्कालीन घटनांचा मागोवा घेणे हे नेमाडेंच्या कादंबऱ्या करतच. कादंबरीलेखनाला देण्यात आलेले हे वळण पुढे अनेकांनी गिरवले. परंतु त्यामागील चिंतनशीलता आणि त्यासाठी लागणारा व्यासंग यांमुळे नेमाडे हे नेमाडे ठरले. त्यांनी समीक्षक या नात्याने पुढे 'देशीवाद' आणि 'जीवनवाद' यांना बरेच महत्त्व दिले. त्यांच्या कादंबऱ्यांतून कोणकोणते विशेष दिसतात, ही सहज जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट नाही.
हे झाले आमच्या नात्यातील लेखक-प्रकाशक या नात्याविषयी थोडेसे सांगण्यासाठी! पण नेमाडे हे खरे आमचे हीरो आणि आमचे दोस्त. ते आधी औरंगाबादला, मग गोव्याला, पुण्याला, लंडनला असे ठिकठिकाणी असायचे. एका अर्थी निदान अधूनमधून भेटायला मित्राचे मुंबईबाहेर असणे हेच श्रेयस्कर. मुंबई ही मुंबईकरांच्या दृष्टीने निवांत भेटायची जागा नव्हे. प्रत्येकजण आपापल्या घाईगर्दीत दंग. त्यामानाने बाहेरून कोणी आले की मुद्दाम भेट शक्य व्हायची. नेमाडेंशी अशा भेटी या महत्त्वाच्या ठरायच्या. काही लेखक फक्त साहित्याबद्दल बोलतात. काही तर फक्त स्वत:च्या साहित्याबद्दल. नेमाडे तसे नाहीत. अनेक विषयांवर ते बोलत असतात. काही वेळा आग्रहपूर्वक, काही वेळा निराग्रही अभ्यासू वृत्तीने. साहित्य, भाषा असे काही विषय त्यांच्याशी बोलायला आपलाही तसाच व्यासंग लागतो. याउलट, काही विषयांत त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त कळते अशी माझी भ्रामक समजूत. तेव्हा हे दोन प्रांत आपोआप टाळले जायचे. बाकी मग नामांतराचा प्रश्न, राजकीय घडामोडी यांसंबंधीही आमची चर्चा चालायची. कोणत्याही पक्षाचा अभिनिवेश न बाळगता राजकारणाची चर्चा करणारे फार थोडे. नेमाडे त्यांपकी एक. त्यातील एक गमतीदार गोष्ट- जी नेमाडेंनाही माहीत नाही..
आम्हा दोघांचा एक मित्र ऑस्ट्रेलियन आहे. तो जवळजवळ दरवर्षी भारतात यायचा. जाताना चारमिनारची पाकिटं घेऊन जायचा. म्हणजे तो किती रुळलेला होता, ते पाहा! आणीबाणीच्या काळात जाताना तो म्हणाला, 'आपण पत्रात या विषयावर जर लिहिलं तर ती पत्रं उघडली जाण्याची शक्यता आहे.' तेव्हा आम्ही आणीबाणीसाठी एक कोडवर्ड ठरवला- 'नेमाडे.' कारण आठवत नाही. पण ते उगाच नसणार.
नेमाडेंशी महत्त्वाचा संपर्क आला तो १९८० साली. आम्ही भरवलेल्या कोल्हापूर सेमिनारच्या वेळी. 'मराठी साहित्य : प्रेरणा व स्वरूप (१९५०-७५)' या विषयावर कोल्हापूर विद्यापीठाच्या सहकार्याने चर्चासत्र भरवले होते. बहुतेक सर्व व्यवस्था प्रा. गो. मा. पवार आणि प्रा. म. द. हातकणंगलेकर यांनी केली होती. वास्तविक या पंचवीस वर्षांच्या काळात खांडेकर-फडके यांच्यातील 'जीवनासाठी कला' की 'कलेसाठी सारे काही' हा वाद मावळून काहीसा कलावादाकडे झुकणारा समन्वय साधला गेला होता. परंतु या चर्चासत्रासाठी निबंध लिहिणाऱ्यांची निवड वेगळ्या प्रकारे करण्यात आली होती. हे चर्चासत्र 'जीवनवादा'चे महत्त्व पुन:प्रस्थापित करणारे ठरले. त्यात भालचंद्र नेमाडे यांचा कादंबरीवरील प्रदीर्घ निबंध इतका प्रक्षोभक ठरला, की हे चर्चासत्र आज तीन दशकांनंतरही 'नेमाडे सेमिनार' म्हणून ओळखले जाते. या चर्चासत्रात 'मौज-सत्यकथा' गटाची किंवा आमच्या वा. ल. कुळकर्णी- गंगाधर गाडगीळ परंपरेतील थोडीच माणसे येऊ शकली. आणि तसे ते झालेही एकतर्फी. नेमाडे यांनी आपली भूमिका अभ्यासपूर्ण पद्धतीने ठामपणे मांडली होती. त्यामुळे त्यानंतरच्या काळात एकूणच साहित्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. सभोवतालच्या जीवनाचे कंगोरे तपासणारी, पण मुख्य पात्राचा सकारात्मक विचार प्रकर्षांने जाणवू देणाऱ्या लेखनाची प्रथा सुरू झाली. त्याचा आमच्या 'पॉप्युलर'च्या जडणघडणीवरही थोडाफार परिणाम झालाच.
'झूल'नंतर नेमाडेंशी प्रकाशक म्हणून संबंध आला तो कवी नेमाडेंशी. त्यांच्या 'मेलडी' आणि 'देखणी' या कवितासंग्रहांनी त्यांच्या प्रतिभेचा वेगळा पलू लक्षात आला. तरी त्यांची मूळ प्रतिमा कादंबरीकाराचीच राहिली. अगदी त्यांच्या समीक्षाग्रंथाला 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळूनही! सहज सांगण्यासारखी गोष्ट- साहित्य अकादमी पुरस्कार हे बव्हंशी श्रेष्ठ साहित्यकाराला दिलेले आहेत. पण त्यातही गंमत आहे. कथाकार गाडगीळांना आत्मचरित्रासाठी, कवी कुसुमाग्रज यांना नाटकासाठी, कवी ग्रेसला ललितबंधासाठी, कादंबरीकार पु. य. देशपांडे यांना 'अनामिकाचे अंतरंग'साठी, तर नेमाडेंना 'टीकास्वयंवर'साठी! तरीही वाचक नेमाडेंकडे कादंबरीकार म्हणूनच पाहत होते. सत्तरनंतरची पिढी ही 'कोसला' आणि 'चांगदेव चतुष्टय़'वर पोसलेली आणि पुढील 'िहदू'ची वाट पाहणारी. आमची कीर्ती वेळ लावणारे प्रकाशक म्हणून. मधे आमच्या एका मित्रानेच विनोदी लेख लिहिताना केशवसुत माझी भेट घेऊ पाहतात.. का, तर त्यांचा कवितासंग्रह अजून प्रसिद्ध झाला नाही म्हणून! तेव्हा 'िहदू'ला एवढी वीस-तीस र्वष लागतात ती माझ्या सुशेगात स्वभावामुळे असे सर्वाना वाटायचे. मी अधूनमधून नेमाडेंना भेटून आग्रह करायचो. सृजनात्मक लेखनाच्या प्रसुतिवेदनांची कल्पना मी करू शकतो. तेव्हा माझा आग्रह काहीसा कमकुवत ठरायचा. पण जेव्हा नेमाडे 'सुचत नाही' किंवा 'विचार करतो' याऐवजी घरगुती कारणे सांगू लागले तेव्हा मी एकदा वहिनींना म्हटले, 'प्रतिभावहिनी, आता तुम्ही तरी त्यांना सांगा ना- निदान माझी लाज राखण्यासाठी.' वहिनी म्हणाल्या, 'छे! छे! आत्ता इतक्यात शक्य नाही. आमच्या मुलाचं लग्न करायचं आहे.' मी म्हटलं, 'अहो, वधूपरीक्षा तुम्हीही करू शकता. कादंबरी फक्त तेच लिहू शकतात ना!' वहिनी लगबगीने म्हणाल्या, 'उलट, कादंबरी पुष्कळ लोक लिहीत असतात. पण लग्नाचं मुलाच्या बापानेच पाहायचं असतं.' सुदैवाने मुलांच्या नोकऱ्या, लग्न, संसार सारे काही सुरळीत पार पडून 'िहदू' चतुष्टय़ाच्या प्रकाशनाला सुरुवात झाली.
हे चालू होतं तेव्हा नेमाडे मुंबई विद्यापीठाच्या कालिना परिसरातील बंगल्यात राहायचे. तिथे छोटेसे अंगण होते आणि मुंबईत अशक्य वाटेल अशी छान झाडे होती. त्यात एक माडही होता. नेमाडे सांगत होते की, ते या झाडाखाली बसून वाचत असतात. मी वर पाहिले. अचानक नारळ पडला तर! माझ्या डोळ्यांतील भीती पाहून नेमाडे म्हणाले की, 'नारळ कधी माणसाच्या डोक्यावर पडत नाही. असं झाल्याचं कधी ऐकलं नाही.' खरं-खोटं कोण जाणे; पण नेमाडे सुखरूप विद्यापीठातून निवृत्त झाले.
आत्ता नेमाडेंशी मीच नव्हे, तर माझ्या सहकाऱ्यांचाही संपर्क असतो. मी गेली पाऊणशे र्वष माझ्या भोवतालच्या मंडळींकडून काही ना काही शिकत आलोय. शिक्षक शिकवतो म्हणण्यापेक्षा विद्यार्थी शिकत असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. विशेषत: माझ्या थोर थोर लेखकांकडून त्यांना अजाणता मी ओरबाडून घेत असतो. नेमाडे यांच्याकडे देण्यासारखे खूप काही आहे. माझ्या परीने मी नेमाडे आणि त्यांच्या जवळचे यांच्याकडून खूप काही घेतले आहे. काही प्रमाणात माझे सहकारीही या सांस्कृतिक लुटालुटीत सामील आहेत. त्यामुळे 'पॉप्युलर प्रकाशन'च्या धोरणातही काही चांगला फरक पडलेला आहे. माझ्या या न संपणाऱ्या विद्यार्थीवृत्तीमुळे मी निवृत्त होऊनही पॉप्युलरच्या शाळेत रेंगाळत असतो.- आता 'िहदू'च्या पुढील भागांची वाट पाहत!

'कोसला'ची निर्मितीप्रक्रिया

Published: Sunday, May 26, 2013
http://www.loksatta.com/lokrang-news/bhalchandra-nemade-and-making-of-kosala-118655/
 
मराठी साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या 'कोसला' या भालचंद्र नेमाडे यांच्या पहिल्या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेसंदर्भातील रोचक माहिती.. त्यासंबंधीची मतभिन्नता.. तसंच कादंबरीच्या प्रसिद्धीपश्चात नेमाडेंच्या आई-वडिलांची उमटलेली तीव्र प्रतिक्रिया..
'कोसला'च्या निर्मितीप्रक्रियेसंबंधात प्रकाशक रा. ज. देशमुख यांच्या पत्नी सुलोचनाबाई देशमुख यांनी  दिलेली माहिती..
'बासष्टच्या आसपास अशोक शहाणे आमच्याकडे राहत होता. आमच्या घरी तो दोनेक वर्षे तरी असावा. त्याने बी.ए.च्या परीक्षेला बसावे म्हणून मी धडपडत होते. शिवाय आमच्या कंपनीच्या चौकटीत तो बसला तर पुष्कळच चांगले होईल असे मला वाटत होते.
नेमाडे आमच्याकडे अशोकबरोबर येऊ लागला, राहू लागला. क्वचित वृंदावन दंडवते, भाऊ पाध्ये येऊन जात. यांच्या गप्पांत देशमुखही सामील होत. एक दिवस देशमुख मला म्हणाले, 'अशोकचे काही खरे नाही. पण नेमाडेकडून तू कादंबरी लिहून घेतलीस तर ती चांगली होईल असे मला वाटते. या मुलात ते गुण मला दिसतात.'
मी म्हटले, 'ही मुले वळली तर सूत, नाही तर भूत. पण तुम्हाला नेमाडय़ांबद्दल एवढा विश्वास वाटत असेल तर बघते प्रयत्न करून.'
आणि मग हळूहळू माझ्या पद्धतीने नेमाडे कशा प्रकारे लिहू शकेल याचा मी मनाशी विचार केला व त्यानुसार त्याला लिहिता करण्याच्या प्रयत्नास लागले. नेमाडे सरळ आहे असा माझा विश्वास होता, आजही आहे. या आधारावर तो कसा लिहायला लागेल यासाठी माझी धडपड सुरू झाली. माझ्या धडपडीला यश आले. नेमाडे लिहू लागला. लिहून झालेला भाग मला वाचून दाखवू लागला. आमच्या दोघांचे एकमत झाले तरच बदल केला जात असे. कादंबरीचे 'कोसला' हे नाव मी आणि नेमाडे यांनी विचार करून, शब्दकोशातील अर्थ पाहून ठरवले होते. 'कोसला'चा अंतिम खर्डा त्याने आमच्या घरी राहूनच पुरा केला. रात्रीचे लिहिताना त्याला लाडू आणि सिगारेटी एवढे पुरत असे. 'कोसला'ला देशमुखांनी प्रस्तावना लिहिली तीही नेमाडय़ांच्या संमतीनेच.'
'The India Magazine' च्या मार्च ९३ च्या अंकात मकरंद परांजपे यांचा 'भालचंद्र नेमाडे' हा लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख परांजप्यांनी अर्थातच नेमाडय़ांशी बातचीत करूनच लिहिला असणार. या लेखात परांजपे लिहितात :
Deshmukh approached this angry young man who was always saying outrageous things about establishment.
''What do you think of Khandekar?'' Deshmukh asked Nemade.
''I don't think much of him.''
''And P. L. Deshpande?''
''He is a clown.''
Finally Deshmukh said, ''Instead of abusing and being abused all the time, why don't you write something yourself?''
''If I wanted to write a novel like Khandekar's I would do so in eight days,'' young Nemade replied.
''It's no use just talking,'' Deshmukh replied, ''Do something.''
So that's how 'Kosla' was written. Deshmukh had literally coaxed, cajoled and teased a novel out of Nemade.
वरील दोन स्पष्टीकरणांपैकी ग्राहय़ कुठले? कुठले अग्राहय़?
वस्तुस्थिती काय असेल ती असो! देशमुख- नेमाडय़ांनी एकमेकांना विचारलेले प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरितच राहिले, एवढे बरीक खरे. ७० साली ही कोंडी फुटली. 'कोसला'च्या शिल्लक प्रती ३३ टक्के कमिशनने नेमाडय़ांनी विकत घेतल्या. शिवाय देशमुखांकडून नेमाडय़ांनी घेतलेले पैसे रॉयल्टीमधून वळते करून घेण्यात आले. हा व्यवहार लेखी झाला. आठशे सत्तर रुपयांत मिटला. आणि देशमुख पती-पत्नींना आपल्या घरी अवश्य येण्याचे नेमाडय़ांनी आमंत्रण दिले.
ऑक्टोबरअखेर 'देशमुख आणि कंपनी'ने 'कोसला' कादंबरी प्रसिद्ध केली. या कादंबरीचे लेखक होते भालचंद्र नेमाडे. 'कोसला'आधीचे त्यांचे वाङ्मयीन उद्योग म्हणजे उदाहरणार्थ, 'छंद', 'साधना' यांत छापून आलेल्या कविता, 'रहस्यरंजन', 'आलोचना'साठी लिहिलेले लेख, समीक्षा, वगैरे वगैरे. यांच्याबरोबरीने लिट्ल मॅगेझिन्सची चळवळ.
नेमाडय़ांसारख्या नवख्या लेखकाची कादंबरी देशमुखांनी स्वीकारली. छापली. छापल्यानंतर वाचली. वाचल्यानंतर तीन परिच्छेदांचे छोटेसे प्रास्ताविक लिहिले. त्यातील शेवटच्या दोन परिच्छेदांतील मजकूर असा-
'मराठीमध्ये या पद्धतीने आणि या विषयावरील अशा पद्धतीने लिहिलेली ही पहिलीच कादंबरी आहे, असा माझा समज आहे. पहिली असो अगर नसो, पण लेखकाने जे काही लिहिले आहे ते वाचवते. लेखकाने कुठलीही गोष्ट व्याख्यानाच्या रूपाने सांगितलेली नाही. जे अनुभवले, पाहिले, ते लिहिण्याची प्रामाणिक धडपड त्याने केली आहे.
हा पांडुरंग सांगवीकर हा स्वत:बाबत व समाजाबाबत याच पद्धतीने का लिहितो आहे, याच पद्धतीने विचार मांडण्याची त्याला का इच्छा झाली, तो समाजाकडे याच पद्धतीने का पाहतो आहे, एवढा विचार जरी कादंबरी वाचून पालक- शिक्षक- समाज यांपैकी कुणाच्याही मनात आला, आणि क्षणभर जरी त्यामुळे अस्वस्थता वाटली, तरी खूपच झाले.'
नोव्हेंबर ४, नेमाडय़ांचे देशमुखांना पत्र :
'प्रती छान. गावात बऱ्यापैकी sensation झाले. वडील = प्रचंड वैतागले. Full furious father किंवा Far full furious father. ते आपल्या मित्रमंडळींना म्हणाले, 'कादंबरी म्हणजे खरीच माहिती असते असे नाही. सगळं काल्पनिक असतं हो..' वगैरे.
'आई = वडील नव्‍‌र्हस म्हणून आईही. म्हणाली, 'सगळय़ा गावातल्या आई-बापांच्या गोष्टी आमच्या नावावर छापल्यात! आता आम्हीही 'आमचा मुलगा नालायक निघाला' असं पुस्तक लिहिलं तर देशमुख छापतील काय?' मी म्हणालो, 'नाही.' पण आई सुलो(चना) मावशींना केव्हातरी पत्र टाकणार आहे. कारण तुमच्या कंपनीच्या पाकिटाचा पत्त्याचा कोपरा कुणीतरी फाडून ठेवलाय!
'इकडे शाळा वगैरेंतून खपण्याचा संभव. परंतु तुम्ही लिहिल्याप्रमाणे आता या कादंबरीतून लक्ष काढून घेतो. सतरा-अठरा तारखेला मुंबई. नोव्हेंबरअखेपर्यंत तिकडे येतो. डिसेंबरात चार पेपर, जानेवारी-फेब्रुवारीत दोन पेपर आणि मराठीचे दोन अधूनमधून. मार्चमधे भंकस आणि एप्रिलमधे फ्याट्!' आता हे शेवटचेच.'
('प्रकाशक रा. ज. देशमुख' या पुस्तकातून साभार)

प्रेमाला उपमा नाही...( भाग २ )

Published: Saturday, May 25, 2013
http://www.loksatta.com/chaturang-news/the-different-types-of-love-118573/

प्रेमाच्या वेगवेगळय़ा प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या मूलभूत आकर्षणाचा पाया किती मजबूत आहे हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी मी प्रेमाचे आठ प्रकारचे वर्गीकरण तीन गटांत खालीलप्रमाणे केलेले आहे. त्यामुळे प्रेमविवाहाचा टिकाव किती लागू शकेल वा ते टिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत, याचा अंदाज संबंधितांना येऊ शकेल.
ये इश्क़ नहीं आसाँ इतना तो समझ लीजे
इक आग़ का दरिया है और डूब के जाना है
असे सुप्रसिद्ध शायर जिगर मुरादाबादी यांनी म्हटले आहे. प्रेमाच्या सर्व गोंधळांचा अलिप्तपणे अभ्यास करणारे 'सॉक्रेटिस', 'प्लेटो'पासूनचे अभ्यासक आपली काही प्रमेये, काही सिद्धांत घेऊन प्रेमाचे तत्त्वज्ञान जगापुढे कित्येक शतके मांडत आले आहेत. आता काही वैद्यकीय तज्ज्ञही याविषयी आपापली संशोधने प्रस्तुत करीत आहेत. या सर्वाचा गंभीरपणे विचार केल्यास शृंगारिक 'प्रेम' ही धारणाच मुळी किती खोलवर, अथांग आहे हे ध्यानात येते.
स्टर्नबर्गचा प्रेमाचा त्रिकोण
शृंगारिक प्रेमभावना अन्य व्यक्तीच्या अलैंगिक शारीरिक आकर्षणावर तसेच तिच्यात असणाऱ्या काही अपेक्षित गुणांच्या अस्तित्वावरही अवलंबून असते. परंतु भिन्निलगी व्यक्तीविषयी वाटणारी कुठलीही प्रेमभावना ही वासनारहित नसते. उदात्त प्रेम म्हणजे वासनेपेक्षा इतर गुणांच्या आकर्षणाचे प्राबल्य एवढेच.
मानसशास्त्रज्ञ स्टर्नबर्ग याने 'प्रेमाचा त्रिकोण'या पुस्तकात प्रेमाचे मानसशास्त्र सांगताना आधार म्हणून घनिष्ठता (इन्टिमसी), वासना (पॅशन) व जबाबदारपणा (रिस्पॉन्सिबिलिटी) या तीन गोष्टी मानल्या आहेत. त्यानुसार प्रेमाचे वर्गीकरणही केले आहे. तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात वासनेची तीव्रता जास्त असते, तर कालांतराने निर्माण होणाऱ्या सहवासोत्तर प्रेमामध्ये जबाबदारपणाची जाणीव वाढलेली असते.
प्रेमाचा चौकोन : माझे प्रमेय
परंतु माझ्या मते, प्रेमाचा त्रिकोण नसून चौकोन असतो. त्याला मत्रीची (फ्रेन्डशिप) अत्यंत महत्त्वाची चौथीही बाजू असते. त्याशिवाय प्रेम हे यशस्वीरीत्या टिकू शकत नाही.
या सर्व घटकांचा विचार करून प्रेमाच्या वेगवेगळय़ा प्रकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या मूलभूत आकर्षणाचा पाया किती मजबूत आहे हे जाणून घेतले पाहिजे. वरील सर्व गोष्टींचा विचार करून मी प्रेमाच्या आठ प्रकारांचे वर्गीकरण तीन गटात खालीलप्रमाणे केले आहे. त्यामुळे प्रेमविवाहाच्या यशस्वितेची कल्पना साधारणपणे करता येऊ शकते. म्हणजे प्रेमविवाहाचा टिकाव किती लागू शकेल वा ते टिकवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागणार आहेत याचा अंदाज संबंधितांना येऊ शकेल.
पहिला गट : यामध्ये होणाऱ्या प्रेमाकर्षणाला वास्तवतेचे भान वा जबाबदारीची जाण नसते. हेच ते 'आंधळे' प्रेम. त्यामुळे त्यांच्यात परिपक्वता नसते. आपली प्रिय व्यक्ती ही अत्यंत आदर्श व परिपूर्ण असल्याचा साक्षात्कार अशांना सतत होत असतो. आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी व्यक्तीच आपल्याला मिळाली आहे, असे त्यांना वाटत राहते. परंतु काळाच्या ओघात वास्तवाचे चटके व अपेक्षाभंगाचे फटके मिळाल्याने असे प्रेम उडून जाते. हे लला-मजनू प्रेम. अशा आकर्षणातून होणारी लग्ने टिकवण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात याची कल्पना संबंधितांना आली पाहिजे. यामध्ये तीन प्रेम-प्रकार मी केलेले आहेत.
१. कोवळे प्रेम (काफ लव):
कोवळे प्रेम हे नवतारुण्याच्या सुरुवातीच्या काळातच, टीन एजिंगमध्ये (१३ ते १९ वष्रे वयामध्ये) निर्माण होत असते. याच काळात अननुभवता, निव्र्याजपणा यांचे प्राबल्य असते. या प्रेमाचे वैशिष्टय़ म्हणजे ते वारंवार व वेगवेगळ्या व्यक्तींविषयी उत्पन्न होऊ शकते. याचे कारण त्यात जबाबदारपणाची जाणीव नसल्यामुळे ते उच्छृंखल असते.
२. लुब्ध प्रेम (इन्फॅच्युएशन) :
अचानक पाहिल्या पाहिल्या एखाद्या व्यक्तीविषयी वाटणारी तीव्र ओढ व लुब्धता असे प्रेम निर्माण करीत असते. हे प्रेम कोवळ्याप्रेमापेक्षा वेगळे असते, कारण हे टीन एजिंगनंतर (१३ ते १९ वष्रे वयानंतर) कुठल्याही वयात घडू शकते. प्रथमदर्शनी प्रेमापेक्षाही वेगळे असते कारण हे पहिल्याच नजरेत होईल असे नाही. यात वास्तवतेचे भान नसते तसेच अशा प्रेमसंबंधातून निर्माण होणाऱ्या जबाबदारीची जाणही कमी असते. हे केवळ वैषयिकतेतूनच निर्माण होते असे नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम जडते ती व्यक्ती असामान्य व अद्वितीय असल्याचा साक्षात्कार त्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला अत्यंत तीव्रपणे होत असतो. त्यामुळे हे प्रेम कोवळ्या प्रेमाणेच आंधळे असते.
हे प्रेम एकतर्फी असण्याच्या शक्यता अधिक असतात. कालांतराने अशा प्रेमाची तीव्रता कमी होण्याची भीतीही असते. प्रथमदर्शनी प्रेमापेक्षा अशा प्रेमात जबाबदारपणा व टिकाऊपणा बराच कमी असतो. म्हणून हे प्रेम काळाच्या ओघात निश्चितच नष्ट होते. प्रिय व्यक्तीविषयी आदराची भावना कमी व मालकी हक्काची भावना जास्त असते म्हणूनच या प्रकारातील एकतर्फी प्रेमात 'सूड प्रवृत्ती'ची गुन्हेगारी वृत्ती बळावण्याचे चान्सेस अधिक असतात.
३. प्रथमदर्शनी प्रेम (इन्स्टंट लव) :
प्रेमाचा हा प्रकार कोवळय़ा प्रेमापेक्षा जरा वेगळा असतो. याला वयाचे बंधन नसते. कुठल्याही वयात घडणाऱ्या या प्रेमात, आकर्षण हे क्षणार्धात निर्माण होते व त्याला केवळ शारीरिक आकर्षणच जबाबदार असते असे नाही, तर व्यक्तिमत्त्वातील इतरही अनाकलनीय गोष्टी कारणीभूत असू शकतात. हे प्रेम एकतर्फीच असेल असे नसून त्याला प्रतिसाद मिळण्याची शक्यता असू शकते. कारण यात थिल्लरपणा कमी व सेन्स ऑफ कमिटमेंट जास्त तर प्रिय व्यक्तीविषयी आदराची भावना जास्त व मालकी हक्काची भावना कमी असल्याने 'सूड प्रवृत्ती'ची गुन्हेगारी वृत्ती अत्यल्प असते. म्हणजेच अशा प्रेमात वासनेच्या पलीकडीलही काही कारणे असू शकतात. यात अन्य व्यक्तीच्या इतर गुणांचाही समावेश असतो. परंतु तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात मात्र वासनेची तीव्रता अधिक असते. वाढत्या वयात निर्माण होणारे प्रथमदर्शनी प्रेम मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या आकर्षति करणाऱ्या अन्य गुणांमुळे निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. या प्रेमात कोवळय़ा प्रेमात आढळणारा उच्छृंखलपणा कमी असून भावुकता अधिक असते.
असे प्रथमदर्शनी प्रेम हे वारंवार होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असले तरी पूर्णपणे अशक्य नसते. अशा प्रेमातील आकर्षण हे जास्त करून भावनिक किंवा बौद्धिक असू शकते. वाढत्या वयोमानात घडणाऱ्या अशा प्रेमाला जबाबदारपणाची जाणीव होऊन गंभीरपणाही येत असतो. कष्टाने असे प्रेम, प्रेमविवाह टिकण्याची शक्यता वरील दोन प्रकारांपेक्षा जास्त असते.
दुसरा गट- या गटात मोडणारे प्रेम, काही विशिष्ट निकषांवर आधारित असल्याने यातील प्रेमाकर्षण मुळातच ठिसूळ असते. कारण ते विशिष्ट कारण दूर झाले की या प्रेमाची तीव्रताही कमी होते. उत्तेजकतेचे मूळ कारण नंतर बोथट होत असल्याने अशा प्रेमातून होणारे विवाह हे टिकवण्यासाठी जाणीवपूर्वक कष्ट घ्यावे लागतात.
४. वासनांध प्रेम (पॅशनेट लव) :
यात प्रामुख्याने वासनेचाच भाग असल्याने हे केवळ शारीरिक आकर्षणातूनच उद्भवणारे प्रेम असते. यामध्ये कामसुख ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती बळावत असते. यात जोडीदाराविषयी मालकी हक्काची भावना निर्माण होत असते किंवा त्याला इतर वस्तूंच्या प्रमाणेच वापरण्याची वृत्ती प्रबळतेने उत्पन्न होत असते. तसेच जोडीदाराचे शारीरिक आकर्षण कमी झाल्यास असे प्रेम पूर्णपणे नष्टही होऊ शकते.
५. दयाद्र्र प्रेम (कम्पॅशनेट लव):
अशी भावना प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीविषयी वाटणाऱ्या दयेपोटी किंवा त्याच्याविषयी कीव येऊन निर्माण होत असते. विशेषत: दुसऱ्या व्यक्तीचा विभक्तपणा, एकटेपणा अथवा कोणाच्या तरी सहवासाची त्याला असणारी आत्यंतिक निकड हृदयाला भिडून त्यातून ही भावना निर्माण होऊ शकते. परंतु प्रत्येक प्रेमामध्ये असणारा शारीरिक आकर्षणाचा भाग या प्रेमातही असतोच.
६. उद्देशी प्रेम (पर्पजफुल लव) :
एखादा विशिष्ट उद्देश मनात ठेवून केले गेलेले प्रेम हे मुळात आकर्षण कमी आणि इतर हेतूने प्रेरित असते (उदा. इस्टेट, वारसा, श्रीमंत मुलगा/मुलगी). हे खऱ्या अर्थाने प्रेमविवाह नाहीत. उद्देश सफल झाला की, ती ओढही साहजिकच नष्ट होऊन लग्न असफल होण्याचे चान्स जास्त असतात.
तिसरा गट : वरील सर्व प्रकारांमध्ये जोडीदाराकडून ठेवलेल्या अवास्तव अपेक्षा व त्यामुळे होणारा अपेक्षाभंग आणि अर्थातच त्याने येणारी निराशा नात्याला निस्तेज करीत असते. परंतु या तिसऱ्या गटामधील प्रेमाकर्षणाला वास्तवतेचे भान वा जबाबदारीची जाण असते. या आकर्षणातून होणारे प्रेमविवाह हे टिकणे जास्त सोपे जाते. जोडीदारातील उणिवा, कमतरता समजूनही आपण त्याच्याशी 'अ‍ॅडजस्ट' होऊ शकतो व आपलेपणाच्या भावनेत काहीही फरक पडत नाही, असा आत्मविश्वास अशांमध्ये येतो. वास्तवतेचे भान आल्याने नाते दृढ होत जाते.
७. सहवासोत्तर प्रेम (असोसिएशन लव) :
वारंवार येणाऱ्या संपर्काने शारीरिक आकर्षणाच्या जोडीला भावुकतेची झालर असल्यास अशा प्रकारचे प्रेम निर्माण होत असते. सर्वसाधारणपणे आढळणारे प्रेम हे सहवासोत्तर प्रेमच असते. प्रथमदर्शनी आकर्षण निर्माण न होताही कालांतराने असे प्रेम होऊ शकते. यात वचनबद्धता व जबाबदारपणा निश्चितच असतो. त्यामुळे हे प्रेम परिपक्व असते. तारुण्यातील कोवळ्या प्रेमाचा काळ ओसरल्यावर हे प्रेम कधीही निर्माण होते. विशेषत: सतत संपर्कात येणाऱ्या दोन भिन्न िलगी व्यक्तींमध्ये हे प्रकर्षांने आढळते. त्यामुळे जोडीदाराच्या व्यक्तिमत्त्वाची 'निगेटिव' बाजू लक्षात येऊनही त्यासाठी अ‍ॅडजस्ट होण्याची मनाची तयारी यात होत असते.
८. साहचर्य प्रेम (कम्पॅनियनशिप लव) : हे प्रेमसुद्धा सततच्या संपर्काने निर्माण होते. सहवासोत्तर प्रेमातील संपर्क वारंवार असला तरी तो सततचा नसतो. म्हणजेच दिवसरात्र संपर्कात असणाऱ्या व्यक्तींमध्येच साहचर्य प्रेम निर्माण होते. समाजामध्ये सर्वसाधारणपणे ही गोष्ट वैवाहिक बंधनातील व्यक्तींच्या बाबतीत घडत असते. म्हणून दाम्पत्यामधे विवाहोत्तर काळात या प्रेमाचे महत्त्व फार आहे.
या प्रेमाचे वैशिष्टय़ म्हणजे हे कष्टसाध्य असते. म्हणजेच प्रयत्नाने असे प्रेम करता येण्याची कला आत्मसात करता येते. यासाठी 'आर्ट ऑफ इंटिमसी' म्हणजेच इंटिमसीची कला महत्त्वाची ठरते. यामुळे एरव्हीचे आंतर-व्यक्तीसंबंधातील तणाव काही प्रमाणात सुसह्य़ होऊ शकतात. या प्रेमात मित्रता व जबाबदारपणा यांचा सहभाग फार महत्त्वाचा असतो. मत्रीची बाजू असल्याने कुठल्याही प्रकारचा विवाह असू दे, साहचर्य प्रेम जर साध्य केले तर ते दाम्पत्य 'वेल अ‍ॅडजस्टेड' दाम्पत्य होऊ शकते.
८. अशारीरिक प्रेम? (प्लॅटॉनिक लव?) :
प्लॅटॉनिक लव किंवा अशारीरिक प्रेम ही पूर्णपणे, तत्त्वज्ञानी प्लेटोने प्रसूत केलेली कविकल्पना आहे. अशा भिन्निलगी प्रेमात बौद्धिक आकर्षणाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून शारीरिक आकर्षण हे अत्यल्प असते. तरी ते नाकारता मात्र येत नाही. म्हणजेच असे अशारीरिक प्रेम हे खरोखरच अशारीरिक नसते. आपले वासनामय आकर्षण काही वेळा नाकारण्यासाठी संबंधित व्यक्ती ही पळवाट शोधून काढते. कित्येकदा असे आकर्षण स्वत:लाच अमान्य करून व नाकारून ती व्यक्ती स्वत:लाच फसवीत असते.
प्रेमाची गोडी संबंधितांनी नात्यात जाणीवपूर्वक आणलेल्या परिपक्वतेने वाढते. ही परिपक्वता त्या दोघांच्याही 'आर्ट ऑफ इंटिमसी'मधील पारंगततेवर अवलंबून असते. कारण एकतर्फी प्रेम हे त्रासदायक पण दुतर्फी असणारे प्रेम हेच आनंददायक असते. नाते समृद्ध करते.
इश्क़ जब एक तरफ़ हो तो सज़ा देता है
इश्क़ जब दोनो तरफ़ हो तो मज़ा देता है
आणि कुठलेही भिन्निलगी आकर्षण शृंगारिकच असते व त्यातील शारीरिक, बौद्धिक वा भावनिक घटक पूर्णपणे नसणे हे असंभवच नव्हे तर अनसíगक असते. परंतु एखाद्या घटकाचे प्रमाण जरा कमी असू शकणे शक्य असते. म्हणूनच वर उल्लेखलेल्या प्रेमप्रकारांचा विचार करता लक्षात येईल की, 'प्रेम म्हणजे प्रेम असतं..पण तुमचं आमचं सेम नसतं' हेच खरे आहे.

Saturday, 25 May 2013

प्रेमाला उपमा नाही...( भाग १ )

डॉ. शशांक सामक / जेसिका सामक - shashank.samak@gmail.com
Published: Saturday, May 11, 2013
http://www.loksatta.com/chaturang-news/intimacy-in-women-111415/


स्त्रीची भावुकता तिला 'इंटिमसी'ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल असे तिला जाणवते ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळय़ा कारणांनी वाटू शकते, ही कारणे वेगवेगळी असल्याने 'कुठली स्त्री कुठल्या पुरुषाच्या प्रेमात का आणि कशी पडेल' हे 'देवो न जानाति कुतो मनुष्य'.
एका अप्रसिद्ध शायरने म्हटले आहे,
ज़्‍ारासा हाथ क्या छुआ तो वो बुरा मान गये वो दिलको छूते रहे
और हमने उफ् तक नहीं किया
हा शायर भलेही अप्रसिद्ध असू दे (कारण तो मीच आहे) पण या शेरमधली भावना मात्र जगप्रसिद्ध आहे. 'दिलको छूनेवाली' ही भावना आजवर या मानवी विश्वामध्ये क्रांती करीत आलीय, क्रांती घडवत आलीय. याला प्रेम, प्यार, लव, इश्क, मुहब्बत वगरे वगरे नावांनी आपण ओळखत आहोत. मनाला कुठल्याही वयात भुरळ पाडणाऱ्या व आनंदमय हुरहूर लावणाऱ्या या भावनेमुळे 'साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण' होईपर्यंत होणाऱ्या वेदनेच्या जाणिवा त्या संबंधितालाच भोगाव्या लागत असतात. (तरीही उफ्तक न करणारा माझ्यासारखा विरळाच). परंतु याच आनंद-वेदनेवर होणाऱ्या भावनिक आंदोलनांवर जगप्रसिद्ध शेरोशायरी, पोएट्री, कविता, महाकाव्ये, कादंबऱ्या, नाटके जन्माला आली. अशा साहित्यकृती जन्माला घालणारी व ताजमहालासारखी स्मारके निर्माण करणारी ही 'प्रेम'भावना विश्वव्यापी तर आहेच, पण ती सर्वव्यापीही आहे. कोणीही यातून सुटत नाही हे खरे.
'इरॉस'विषयी, शृंगारिक प्रेमाविषयी बोलताना सॉक्रेटिसने 'शृंगारिक प्रेम हा एक ईश्वरनिर्मित वेडेपणा आहे (लव इज गॉडगिफ्टेड मॅडनेस)' असे सांगितले. प्लॅटोने 'फ्रिडस' या त्याच्या सुप्रसिद्ध ग्रंथामध्ये 'प्रेमरोगा'च्या लक्षणांचे वर्णन करताना सांगितले आहे की, 'या स्थितीत ती प्रेमरोगी व्यक्ती आनंद आणि वेदना एकाचवेळी जाणवत असल्याने गोंधळलेली असते. एक प्रकारच्या विचित्र अनुभवाशी ती असहायपणे झगडत असते. त्याची रात्रीची झोप उडते आणि दिवसाही बेचनी असते. परंतु आपले प्रेमपात्र (प्रियकर, प्रेयसी) दिसेल वा भेटेल या नुसत्या कल्पनेनेसुद्धा त्याला त्याची प्रेमऊर्जा चतन्य देत असते.'
अंग गरम होणे, हातापायांची थरथर, झोप न लागणे, भूक नष्ट होणे, अशक्तपणा जाणवणे, हृदयाची धडधड वाढणे अशी शारीरिक आजाराची लक्षणे जरी आढळत असली तरी प्रेमरोगावर वैद्यकीय क्षेत्रात फार कमी संदर्भ आहेत. मात्र प्रसिद्ध प्राचीन रोमन डॉक्टर गॅलेन याने त्याच्या 'ऑन प्रोग्नॉसिस' या ग्रंथात, तो 'इस्ट्रसच्या बायको'च्या 'निद्रानाश' आजारावर उपचार करण्यासाठी गेला असताना तिच्या लक्षणांचे वर्णन करताना सांगितले आहे, 'तिला तिच्या आजारासाठी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना ती व्यवस्थित उत्तरे देत नसल्याने मला आजाराचे निदान करण्यासाठी काहीच मदत होत नव्हती. पण जेव्हा चौथ्या दिवशी डान्सर प्लायडसचा उल्लेख केला गेला, तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, अंगलक्षणांमधे फरक पडला, नाडीचे ठोके खूपच अनियमित झाले. इतर कुठल्याही डान्सरच्या उल्लेखाने तसे होत नव्हते. माझ्या मते तिचे प्लायडसवर प्रेम जडले होते.' पाश्चात्त्य इतिहासातील 'प्रेमरोगा'चे झालेले हे पहिले वैद्यकीय निदान! गॅलेनने शरीरातील रासायनिक असंतुलनामुळे प्रेमरोग होत असतो, असे सांगितले. थोडक्यात 'प्रेमरोग' ही एक वैद्यकीय अवस्था आहे.
आणि जगभर सर्व मानवी संस्कृतींमध्ये हा रोग पूर्वापार आढळून आला आहे. किंबहुना मानवाच्या सर्वात प्राचीनतम आजारांपकी हा एक आजार आहे. म्हणूनच म्हटले आहे,
जिधर देखो उधर इश्क़के बीमार बठे हैं
हज़ारों मर चुके हैं संक़डो तयार बठे हैं
'प्रेमरोगा'चा उगम हा कामभावनेतून होत असल्याने व उत्तेजित कामभावना ही कुणालाही वेड लावणारी असल्यानेच शृंगारिक प्रेम हा वेडेपणा ठरला आहे. आणि ती निसर्गनिर्मित असल्याने कोणीही यातून मुक्त होत नाही. आधुनिक वैद्यकीय संशोधकांच्या अभ्यासातून कामभावाचा उगम हा मेंदूतील प्रेरणा भागांशी, हायपोथॅलॅमस, लेफ्ट कॉडेट, राईट ग्लोबस पॅलीडस, राईट इन्शुला या भागांशी, निगडित आहे, तर प्रेमभावाची निर्मिती ही भावनेच्या 'लिम्बिक' मेंदूच्या भागांशी (व्हीटीए, कॉडेट, पुटामेन, लेफ्ट मिडल इन्शुला, अँटिरीयर सिंग्युलेट कॉर्टेक्स) संबंधित आहे.
एखाद्या व्यक्तीची 'मोहिनी' पडण्याची कारणे शोधणे पुरुषाच्या बाबतीत अवघड नसतात पण स्त्रीच्या बाबतीत मात्र अनाकलनीय असू शकतात. कारण दोघांच्या मेंदूक्रियेतच निसर्गाने याबद्दल वेगळेपणा आणलेला आहे. पुरुषाला स्त्रीचे रूप, शारीरिक ठेवण यामुळे प्रामुख्याने ओढ निर्माण होते, तर स्त्रीमध्ये पुरुषाच्या शारीरिक गुणांपेक्षा इतर गुणांची भुरळ पडत असते. पुरुषामध्ये असणाऱ्या पुरुषत्वाच्या 'टेस्टोस्टेरॉन' हॉर्मोन रसायनाचा प्रभाव तो वयात येताना मेंदूतील 'मॅमिलरी बॉडी' भागावर पडत असल्याने तर स्त्रीमध्ये तिचा स्त्रीत्वाचा 'इस्ट्रोजेन' हॉर्मोन भावुक करत असल्याने या गोष्टी घडत असतात.
स्त्रीची भावुकता तिला 'इंटिमसी'ची, जवळीकतेची ओढ निर्माण करते, आणि मग ज्याच्याकडून इंटिमसी मिळेल असे तिला जाणवते ती व्यक्ती तिचे मन काबीज करते. ही इंटिमसी वेगवेगळय़ा कारणांनी वाटू शकते, ज्याचे कोणीही अनुमान करू शकत नाही. एवढेच नव्हे तर प्रत्येक स्त्रीमध्ये ही कारणे वेगवेगळी असल्याने 'कुठली स्त्री कुठल्या पुरुषाच्या प्रेमात का आणि कशी पडेल' हे 'देवो न जानाति कुतो मनुष्य'. म्हणूनच प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व 'मनोविश्लेषणाचा जनक' (फादर ऑफ सायको-अ‍ॅनॅलिसिस) डॉ. सिग्मंड फ्रॉईड यांनी प्रांजळपणे कबूल केले की '३० वर्षांच्या स्त्रीमनाच्या माझ्या अभ्यासानंतरही मला एका गोष्टीचा थांगपत्ता लागला नाही की, स्त्रीला नेमके काय पाहिजे असते?' मलाही माझ्या गेल्या ३२ वर्षांच्या व्यावसायिक (व त्याहीपेक्षा जास्त काळ वैयक्तिक) अनुभवातून फ्रॉईड यांच्या या वाक्याला अनुमोदन द्यावेसे वाटते. मला तर असेही वाटते की स्त्रीलासुद्धा स्वतला पुरुषाविषयी तिला भुरळ पाडणाऱ्या कारणांचा पत्ता असेलच असे नाही. तिचे मोहमयी विश्व पुरुषाच्या वेगवेगळय़ा 'व्यक्तिमत्त्व' कारणांवर आधारित असल्याने वेळोवेळी वेगवेगळय़ा कारणांनी वेगवेगळय़ा व्यक्तींविषयी तिला ओढ निर्माण होऊ शकते.
या कारणवैविध्यामुळे स्त्रीचे, तर शरीराकर्षणाच्या एकमेव प्रमुख कारणामुळे पुरुषाचे मन हे प्रेमाच्या मोहमयी दुनियेत 'चंचल' बनत असते. म्हणून म्हटले जाते की रिलेशनशिपमध्ये स्त्रीची अनेक स्वप्ने असतात, तर पुरुषाचे एकच. एकच स्वप्न असले तरी त्याला 'प्रेम' म्हणत त्याच्या 'स्वप्नपूर्ती'च्या नादात पुरुष अनेकांच्या मागे भरकटत असतो (आणि स्वतची फरफट करून घेत असतो). 'प्रत्येक पुरुषामध्ये एक विश्वामित्र लपलेला असतो आणि त्याला लुभावणारी मेनका तो शोधत असतो' असे म्हटले तर वावगे होणार नाही. म्हणून अशा 'प्रेमळ' पुरुषांचे, तरुणांचे प्रेम हे अजरामर, कधीही न मरणारे असते, परंतु ते ज्याच्यावर प्रेम करीत असतात त्या व्यक्ती मात्र बदलत राहातात हे खरे. पुरुषाचे प्रेम असे प्रासंगिक असल्याने त्याची प्रवृत्ती ही 'मिळाली संधी की कर प्रेम' अशी बनते. म्हणून अशांना 'संधिसाधू' म्हणणे चुकीचे ठरणार नाही.   
एखादी आवडती व्यक्ती पाहिली किंवा पाहिलेली व्यक्ती आवडली की, दृष्टिज्ञान मेंदूभागातून (व्हिज्युअल कॉर्टेक्स) मेंदूगर्भातील व्हीटीए भागाकडे संवेदना जातात. मग व्हीटीए भागात 'फेनिलएथिलामाईन' (पीईए) हे मेंदूपेशी उत्तेजक रसायन वाढते. मेंदूपेशींमधील संदेशवहन वेगाने वाढून मेंदूची उत्तेजकता वाढते. प्रेमरोगाची ही तर सुरुवात. पीईएमुळे डोपामिन हे आनंद-रसायन वाढत असते. त्याचा परिणाम हायपोथॅलॅमस, न्युक्लिअस अ‍ॅक्युम्बन्स या मेंदूतील आनंदकेंद्रांवर होतो. प्रेमाकर्षण निर्माण होते. न्युक्लिअस अ‍ॅक्युम्बन्समधे डोपामिनने निर्माण होणाऱ्या अण्डॉर्फिन रसायनांमुळे स्वर्गानंद वाढतो. तसेच पीईएमुळे नॉरएपिनेफ्रिन रसायनही मेंदूत वाढून अंगकाप, उत्तेजकता, निद्रानाश, भूक मंदावणे हे परिणाम दिसायला लागतात. झाला प्रेमरोग!
डोपामिनमुळे मानसिक संतुलनाचे सेरोटोनिन हे रसायन कमी होते, पण रोमान्सचा हॉर्मोन ऑक्सिटोसिन वाढतो. कमी झालेल्या सेरोटोनिनमुळे वैचारिक संतुलन ढळते व संबंधित व्यक्तीविषयी उन्मादक आकर्षण (ऑब्सेशन) वाढते. ऑक्सिटोसिन हा ममत्व, जिव्हाळा, बॉिण्डग वाढवणारा. जितके ऑक्सिटोसिन जास्त व सेरोटोसिन कमी तितके प्रेम व आकर्षण वाढते. हा 'ऑब्सेशन' व 'मॅडनेस'चा परिणाम साधारणत काही महिने ते एक वर्षांपर्यंत टिकून राहू शकतो, असे विविध संशोधकांना आढळले आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पीईए, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन यांसारख्या प्रेम-रसायनांच्या परिणामांना मेंदू सवय करून घेतो व त्याची उत्तेजकता कमी होत जाते. मात्र ऑक्सिटोसिन वाढवण्याच्या रोमँटिक कृतींमुळे नात्यातील जिव्हाळा त्यापुढेही टिकून राहू शकतो व ते प्रेमनाते मजबूत बनू शकते.
सेरोटोनिन हे वैचारिक स्थर्य देणारे, सारासारविचारशक्ती बळकट करणारे मेंदू-रसायन आहे. तेच कमी झाल्याने 'प्रेमात पडलेल्या व्यक्ती'ची सारासारविचारशक्ती का नष्ट होते व 'ऑब्सेशन'मुळे प्रेमपात्राच्या विचारांशिवाय दुसरे का काही सुचत नाही हे लक्षात येईल. वास्तवतेचे भान न राहिल्याने आपला प्रियकर (वा प्रेयसी) ही एक आदर्श व परिपूर्ण व्यक्ती असल्याचा साक्षात्कार त्याचमुळे क्षणोक्षणी होत असतो. म्हणूनच प्रेमाला 'आंधळे' म्हटले गेले आहे. याच 'ऑब्सेशन'मुळे प्रिय व्यक्तीची प्रतीक्षा करणेसुद्धा कठीण जात असते. 'काळवेळ' याचे भान या 'क्लाउडी' मनामुळे जात असते आणि मग अशांना आतुरता वाढल्याने वाटत राहाते,
आप आते नहीं तो वक्त गुजरता क्यूँ नहीं
आप आते हो तो वो ठहरता क्यूँ नहीं   
थोडक्यात प्लॅटो किंवा गॅलेनने सांगितलेली 'प्रेमरोगा'ची सर्व लक्षणे या रासायनिक घडामोडींमुळेच दिसून येतात. जी औषधे सेरोटोनिन वाढवतात (अँटी डिप्रेशन, वीर्यपतन लांबवणारी इ.) यांचा गंभीर तोटा म्हणजे प्रेमात पडलेल्या व्यक्तीमधील प्रेमाकर्षणाची तीव्रता कमी होत जाते किंवा प्रेमात पडण्याचे चान्सेसही कमी होतात.  
हेही लक्षात ठेवण्यासारखे आहे की प्रेमभंग झाल्यास कमी सेरोटोनिन असल्याने व्यक्तीला 'डिप्रेशन' पटकन येत असते. परंतु प्रेमभंग झालेल्या व्यक्तीने एक बाब ध्यानात ठेवली पाहिजे की तिने तर तिच्यावर प्रेम न करणाऱ्या व्यक्तीला गमावले असते, पण जिने प्रेमभंग केला आहे त्या व्यक्तीने तर तिच्यावर प्रेम करणारी व्यक्ती गमावलेली असते. नुकसान कुणाचे? 
सृजनासाठी विश्वामध्ये निसर्गाने जो 'कामभाव' निर्माण केला त्यातून प्राण्यांमध्ये भिन्निलगी आकर्षण तयार होत असते आणि मानवामध्ये त्यातूनच हा शृंगारिक 'प्रेमभाव'ही जन्माला येतो. म्हणून कुठलेही विरुद्धिलगी शृंगारिक प्रेम हे निष्काम असूच शकत नाही. प्रेमाविषयी काहीही सांगणे आतापर्यंत कवी, लेखक, तत्त्वज्ञानी इत्यादींचे क्षेत्र मानले गेले होते. परंतु सध्याच्या वाढलेल्या कामसमस्या व प्रसार माध्यमातून कुमार-कुमारींना, युवक-युवतींना होणारी एकतर्फी प्रेमाची व लंगिकतेची अपरिपक्व जाण बघता याविषयी डॉक्टरांनी विशेषत लंगिक-समस्या तज्ज्ञांनी उद्बोधन करणे नितांत आवश्यक आहे.
(प्रेमाला उपमा नाही- भाग २ प्रसिद्धी २५ मे)

Friday, 24 May 2013

मुंबई विद्यापीठातून गिरवा अभिनयाचे धडे

मुंबई दि.२४मे:- चित्रपटसृष्टीचे आकर्षण प्रत्येकालाच असते. दिवसेंदिवस चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात करिअर करणा-यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून अनेकदा विद्यार्थ्यांकडून होणा-या मागणीचा विचार करून मुंबई विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षांपासून चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राशी संबंधित पाच अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्राशी संबंधित पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाची सर्व माहिती लवकरच मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ( http://mu.ac.in/ ) देण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थ्यांना फिल्म, टीव्ही अँण्ड न्यू मीडिया प्रॉ़डक्शन या विषयात पदवी ते पदव्युत्तर पदविका घेता येईल. तसेच मास्टर ऑफ एंटरटेन्मेंट स्टडी आणि फिल्म स्टडीमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स यांसारखे अनेक अभ्यासक्रमही सुरू करण्यात येतील.

अशाप्रकारे मुंबई विद्यापीठाने इच्छूक विद्यार्थ्यांना दिलेली ही सूवर्णसंधीच आहे, असे म्हणता येईल.


- प्रतिमा कांबळे

Tuesday, 21 May 2013

श्रावणझडी

श्रावणझडी, कोरी साडी

उलगडे अलगद

मनात ...


श्रावणगंध, ओला धुंद

हर्षाचा निशिगंध

अंगणात...


श्रावणसाज, गुलाबी लाज

मनीचा राजा

स्वप्नात...


श्रावणरंग, हळदीचे अंग

भरले केशर

भांगात...


श्रावणबेत, खुलवित नेत

सापडावे चंदन

स्वतःत...


श्रावणगाणी, झिम्माड क्षणी

तृप्तीचा अंकुर

गर्भात...


श्रावणसडा, माहेरी धाडा

दाटली हुरहूर

डोळ्यांत...


बाईचे हे बाईपण

जणू भोगतो श्रावण

     चैतन्याची खूण, सर्वांगात...


                                        - प्रतिमा संजीवनी

Thursday, 16 May 2013

आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमुळे आता तुरूंगाची हवा खाणार श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया..

मुंबई दि.१६ मे: भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचा खेळाडू एस.श्रीशांतसह अंकित चव्हाण आणि अजित चंडtलिया या खेळाडुंना दिल्ली पोलिसांनी काल मरिन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये छापा टाकून  स्पॉट फिक्‍सिंग केल्या प्रकरणी अटक केली आहे.या तीन खेळाडुंबरोबरच सात बुकिंनाही पोलिसांनी अटक केली आहे.

यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी काही पैसे आणि स्पॉट फिक्‍सिंगचे साहित्य जप्त केले आले. आयपीएल सामन्यात मोहाली आणि मुंबईतील आयपीएल सामन्यांचा काही भाग फिक्‍स करण्यात आला होता, असे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.हा छापा दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आला होता. याप्रकरणी अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाचे मालकीहक्क अभिलेत्री शिल्पा शेट्टीकडे आहेत.कालच मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात वानखेडे मैदानावर झालेल्या सामल्यामध्ये राजस्थानने उत्तम कामगिरी बजावली.यासाठीच हे स्पॉट फिक्सिंग केले गेल्याची शक्यता आहे.

काय असतं स्पॉट फिक्सिंग ???

खेळल्या जाणा-या सामन्यामध्ये एखाद्या ओव्हरमध्ये  नो बॉल किंवा वाईड बॉल करणे, कॅच सोडायचे कधी हे सर्व प्रकार आधीच ठरवून फिक्स केले जातात आणि त्यानुसार ठरल्याप्रमाणे सामना खेळताना तसे केले जाते.


- प्रतिमा कांबळे